ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून अनेक साखर कारखाने ऊस गाळपाकरिता घेऊन जात आहेत. साखर कारखान्याने ऊस दर जाहीर करणे बंधनकारक असताना देखील दर जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने ओंकार शुगर, 20-20 शुगर या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांची भेट घेत ऊस दर जाहीर करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
यंदाच्या खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी, खतांच्या किमतीत होणारी वाढ, वाढते मजुरीचे दर, ऊस पिकावर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणारा खर्च, यामुळे ऊस उत्पादनासाठी खर्चात वाढ झाली असून ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
शिष्टमंडळाच्या या आहेत मागण्या….
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उसाला एफ.आर.पी. दर 4000 रु. देण्यात यावा, नियमानुसार ऊस गाळप सुरू करण्यापूर्वीच कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, जेणेकरून ऊस कोणत्या कारखान्यास द्यायचा हे ठरवण्यास शेतकऱ्यांना सोपे होईल. एक रकमी एफआरपीदर शेतकऱ्यांना ऊस गेल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत वितरित करावेत. ऊस कारखान्यांकडून होणारी उसाच्या वजनाची व रिकव्हरीची चोरी रोखावी, शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कोणतेही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध असताना अवाजवी पणे लांबून वाहतूक करून ऊस गळपास आणू नये व विनाकारण वाहतूक खर्च वाढवू नये या मागण्याकरिता ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीचे कॉ.एड.अजय बुरांडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, दत्ता गव्हाणे, बळीराम मुंडे, ईश्वर सोनवणे, कॉ.भगवान बडे, सुमंत उंबरे आदी शिष्टमंडळाने साखर कारखानदाराकडे केली आहे.