पाटोदा : नव महाराष्ट्र न्यूज
आजच्या स्पर्धात्मक युगात उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची मोठी धडपड सुरू आहे. मात्र नोकरीच्या मागे धावण्याऐवजी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी व्यवसाय उभारता येतो, हे महासांगवी येथील श्रीकृष्ण गर्जे व प्रल्हाद गर्जे या दोन सख्ख्या भावांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. M.Com. व B.Ed. सारखे उच्च शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या संधी न मिळाल्याने खचून न जाता, या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रेशीम शेतीचा मार्ग स्वीकारत आज आर्थिक स्वावलंबन साधले आहे.
निराशेतून नवउद्योगाकडे प्रवास शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करूनही अपेक्षित संधी न मिळाल्याने गर्जे बंधूंनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा व शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय शोधताना त्यांनी रेशीम शेतीचा अभ्यास केला. तज्ज्ञांचे मार्गदर्शन,प्रशिक्षण आणि आधुनिक पद्धती आत्मसात करत त्यांनी हा प्रयोग सुरू केला. शासकीय योजनांचा योग्य वापर रेशीम शेतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत (EGS) शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेतून तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४ लाख ४२ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध होते. गर्जे बंधूंनी बीड जिल्हा रेशीम कार्यालयात रीतसर नोंदणी करून या योजनेचा लाभ घेतला. एप्रिल २०२५ मध्ये त्यांनी तुतीची लागवड केली असून रेशीम कोश संगोपनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त शेडची उभारणी केली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तुती लागवडीपासून रेशीम कोश उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. तापमान नियंत्रण, स्वच्छता, वेळेवर खाद्य व्यवस्थापन यामुळे रेशीम कोशांची गुणवत्ता उत्तम मिळत आहे. त्यामुळे उत्पादन वाढी सोबतच बाजारातही योग्य दर मिळत असल्याचे गर्जे बंधूंनी सांगितले. लाखोंचे उत्पन्न; आर्थिक स्थैर्य प्राप्त रेशीम शेती हा कमी खर्चात अधिक व शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय ठरत आहे. एक एकर तुती लागवडीतून वार्षिक ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते,असा विश्वास या तरुण शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या उत्पन्नामुळे त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे तर कुटुंबाचेही आर्थिक स्थैर्य निर्माण केले असून भविष्यात हा व्यवसाय आणखी विस्तारण्याचा त्यांचा मानस आहे.
पाटोद्याचे तहसीलदार डी. बी. निलावाड यांनी महासांगवी येथील रेशीम शेतीला भेट दिली. यावेळी त्यांनी तुतीची लागवड, रेशीम कोशांची वाढ, उत्पादन प्रक्रिया तसेच शेडच्या बांधकामाची सखोल माहिती घेतली. उच्चशिक्षित तरुणांनी आधुनिक, पूरक व व्यावसायिक शेतीकडे वळावे,असे आवाहन करत गर्जे बंधूंच्या कार्याचे तहसीलदार निलावाड यांनी विशेष कौतुक केले. गावातील तरुणांसाठी आदर्श या यशस्वी प्रयोगामुळे महासांगवी गावात नवचैतन्य निर्माण झाले असून अनेक तरुण शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहू लागले आहेत. गर्जे बंधूंच्या यशामुळे ‘नोकरीच्या प्रतीक्षेत बसण्यापेक्षा उद्योजक बना’ हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचत आहे. या पाहणीप्रसंगी व्ही. एच. घोगरे, एस. एम. मराठे (ऑपरेटर) यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी प्रयोगामुळे महासांगवी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ‘नोकरी देणारे व्हा, नोकरी घेणारे नको’ हा विचार प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र दिसत आहे.



