मुख्यमंत्री, पालकमंत्री तक्रार : डॉ. गणेश ढवळे
बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण, बांधकाम आणि आरोग्य विभागांमध्ये विभागप्रमुखांचा मनमानी कारभार सुरू असून, विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता “प्रतिनियुक्ती” ऐवजी “अतिरिक्त कामकाज” या गोंडस शब्दाखाली आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच विभागात ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.
डॉ. ढवळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की —“जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. मात्र, प्रतिनियुक्ती हा शब्द न वापरता ‘अतिरिक्त कामकाज’ या नावाखाली मोठ्या प्रमाणात प्रतिनियुक्त्या करून नियमांचा बेकायदेशीर पद्धतीने भंग केला जात आहे. काही विभागप्रमुख आपल्या आवडत्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय किंवा विनंती बदलीनंतरही त्याच विभागात ठेवत आहेत.”
हा प्रकार विशेषतः शिक्षण, बांधकाम आणि आरोग्य विभागात प्रकर्षाने दिसत असून, अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी काम करत आहेत. काही विभागप्रमुख थेट सीईओ यांच्या नावावर फाइल पाठवतात, ज्यामुळे सामान्य प्रशासन विभागाची प्रक्रिया पूर्णपणे वगळली जाते.
डॉ. ढवळे यांच्या म्हणण्यानुसार – “सीईओ यांच्या चांगुलपणाचा काही अधिकारी गैरफायदा घेत आहेत. सध्या जिल्हा परिषदेतील १०० हून अधिक कर्मचारी ‘अतिरिक्त कामकाज’च्या नावाखाली महत्वाच्या टेबलवर बसले आहेत. या प्रकारामागे हितसंबंध आणि सत्ताधारी गटांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली असून, लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



