Monday, March 2, 2026
spot_img

बीडचा निर्णय ठाम, घड्याळाला मत नाही, रिपाई चे पप्पू कागदे आक्रमक

आंबेडकरी समाजाची एकजूट;राजेशाही बीडच्या वेशीबाहेर फेकू

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून झालेल्या दगाफटक्याचा पर्दाफाश करत युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी प्रस्थापित पक्षांवर जोरदार प्रहार करित अशा प्रवृत्तिंच्या विरोधात आज (दि.19) नोव्हेंबर 2025 रोजी बीड शहरातील आंबेडकरवादी सर्वपक्षीय संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद हॉटेल नीलकमल येथे घेऊन त्यांनी तिकीट वाटपातील गैरव्यवहार, माफिया हस्तक्षेप आणि समाजाला डावलण्याचा कट असल्याचा थेट आरोप केला.

या संयुक्त पत्रकार परिषदेस युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे, डीपीआय प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे,वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, बबन वडमारे, ज्ञानोबा माने, रवी वाघमारे, अड. देवदत्त शिंदे, अशोक सोनवणे, राजू जोगदंड, मझर खान, सिद्धार्थ शिंगारे यांच्यासह दलित पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पप्पू कागदे म्हणाले, “मी स्वतः निवडणूक लढण्यास तयार नव्हतो. समाज, कार्यकर्त्यांनी विनंती केली म्हणून जबाबदारी घेतली. पण मी कोणाच्याही दारात तिकीट मागायला गेलो नव्हतो. मला त्यांनीच बोलावलं.” आ. विजयसिंह पंडित यांनी सांगितले की अजित दादा पवार यांचा निरोप असून निवडणूक लढवावी अशी विनंती केली आहे.त्यानंतर रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून सर्व तांत्रिक अडचणी दूर करुन घड्याळ या चिन्हावर लढायला तयार झालो. परंतू प्रस्थापितांचा डाव वेगळाच होता. “आमचा वापर करून शेवटच्या क्षणी माझी उमेदवारी कापली. खऱ्या एससी महिलेला तिकीट न देता मुजीब शेख यांच्या सासूला तिकीट देणे म्हणजे समाजाचा उघड अपमान आहे. ही निवडणूक नाही, हा डुप्लिकेट खेळ आहे.” तिकीट वाटपात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत कागदे म्हणाले. “भू-माफिया, वाळू-माफिया आणि वक्फ बोर्डाच्या जमीन व्यवहारांसाठी घुसखोरी केली गेली. पैसा आणि दबाव तंत्रांचा वापर करून घड्याळ चिन्हाच्या तिकीटाचा लिलाव केले. भूमाफियांना उमेदवारी देवून नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी व वक्फ बोर्डाच्या असलेल्या जमिनी भू माफियांच्या नावे करण्यासाठी प्रस्थापितांकडून मागासवर्गीय उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून दूर ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित यांचे थेट नाव घेवून म्हणाले की, बीडमध्ये राजेशाही चालणार नाही. लोकशाहीच्या नावाखाली डावपेच करणाऱ्यांना आम्ही वेशीबाहेर टाकू. समाजावर कुणीही मनमानी लादू शकत नाही.

” या पत्रकार परिषदेत अजिंक्य चांदणे म्हणाले, मागासवर्गीयांना चाळीस वर्षानंतर आरक्षणाच्या माध्यमातून नगर अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. परंतु राजकीय प्रस्थापितांकडून मागासवर्गीयांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेमुळे बीडचे राजकीय वातावरण आणखी तापले असून प्रस्थापित पक्षांवर आंबेडकरी समाजाचा रोष तीव्र झाला आहे.

घड्याळाला एकही मत नाही!:

या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला, एकही मत नाही, अशी ठाम भूमिका आंबेडकरी समाजाने घेतली आहे. त्यासाठी येत्या
२५–२६ नोव्हेंबर रोजी प्रस्थापितांना नगर परिषद निवडणूकीत धडा शिकविण्यासाठी बीड शहरातील आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय पदाधिकारी व्यापक बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.

नाहक नोटीस देवू नयेत :

कागदे यांनी पोलीस प्रशासनालाही थेट इशारा दिला.
“पोलीस अधीक्षकांनी नाहक नोटिसा धाडण्याचे नाटक थांबवावे. आधी शहरातील मटका, जुगार, वेश्या व्यवसाय, पत्ते क्लब यावर कठोर कारवाई करा. सरकारच्या दबावाखाली आंबेडकरी जनतेला त्रास देऊ नका.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles